(बारामती शहर मूकनायक प्रतिनिधी गणेश मच्छिंद्र भोसले )
रायगड :- काल रात्री ११ वाजता इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. अजूनही शंभराच्या जवळपास लोकांचा शोध आहेत. काही वेळापूर्वी मुसळधार पावसामुळे शोध मोहीम थांबवण्यात आलेली आहे. दुपारपर्यंत मृतांचा आकडा १२ होता. आता तो आकडा १६ पर्यंत जावून पोहोचला आहे. ९३ जणांना बचाव पथकांनी सुखरुप बाहेर काढलेलं असून जवळपास शंभर जणांचा अजूनही शोध लागलेला नाही. काल रात्री काळ्याकुट्ट अंधारामुळे आणि पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. दिवसभर बचावकार्य सुरु होतं मात्र अडचणींचा सामना करावा लागला. सकाळपासून एनडीआरएफ, एसडीआरफ आणि समाजसेवी संस्थांनी मोठं काम उभा करुन अनेकांचा जीव वाचवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री इर्शाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. नंतर त्यांनी दीड तास पायपीट करुन इर्शाळवाडीत दुर्घटनाग्रस्त गावाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बचावकार्यात सहभाग घेतला होता. दुसरीकडे अधिवेशन सुरु असल्याने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर त्यांनी कामकाजाची जबाबदारी टाकली असून स्वतः घटनास्थळी मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, दरड कोसळण्याची ही घटना रात्री ११ च्या सुमारास घडली. ४८ कुटुंब असलेल्या या गावामध्ये २२८ जण राहत असल्याची माहिती समोर आली असून अजूनही शंभराच्या जवळपास लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत

